मराठी

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले.

असं म्हणतात ज्ञान वाटल्याने वाढतं. पण दीडशे- दोनशे वर्षांपूर्वी हे वाक्य काहीसं असं असावं : ‘ज्ञान काही जातीच्या पुरुषांना वाटल्यानेच वाढतं’. कारण तेव्हा शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त सवर्ण पुरुषांनाच होता. नंतर इंग्रज आले आणि त्यांनी मिशनरी शाळांद्वारे शिक्षण सर्वांसाठीच खुलं केलं. पण फार कमी लोक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवत. कारण काय तर धर्मांतराची भीती आणि ‘शूद्र, अतिशूद्र व बायकांना तर शिकण्याचा अधिकारच नाही’. ‘हे शिकून पुढे काय करणार?’ हा खूप मोठा प्रश्न होता. जर हे शिकले तर विचार करू लागतील आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न करू लागतील, हेच एक कारण होतं बहुजनांना आणि स्त्रियांना शिकू न देण्याचं.

मात्र अशा परिस्थितीमध्ये ही ज्योतिराव फुले शिकले आणि स्वतःच्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाईंना ही शिकवले. अर्थात टाळी एका हाताने वाजत नाही. सावित्रीबाईंना शिक्षणाचं महत्त्व कळालं. शिक्षणाने माणूस किती प्रगत होऊ शकतो, आणि ही प्रगती फक्त भौतिक दृष्ट्या नाही तर बौद्धिक दृष्ट्या आहे हे जेव्हा एखाद्याला कळतं तेव्हा तो माणूस खरा ज्ञानी होतो. हेच सावित्रीबाईंना कळालं आणि त्यांनी शिकण्याची जिद्द दाखवून आपलं शिक्षण पूर्ण ही केलं. पुढे पुण्याला आणि अहमदनगरला जाऊन शिक्षिका होण्यासाठी विशेष प्रशिक्षण ही घेतलं. १ जानेवारी १८४८ साली सावित्रीबाई व ज्योतिराव यांनी पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरु केली. ही शाळा भारतीयांनी सुरु केलेली मुलींसाठीची पहिली शाळा होती. पुढे बहुजनांचे, प्रौढांचे शिक्षणवर्ग ही सुरु केले. त्यांच्या शाळेचा अभ्यासक्रम हा त्या वेळेच्या इतर शाळांपेक्षा वेगळा होता. सवर्ण शिक्षकांच्या शाळांप्रमाणे इथे वेद – पुराण शिकवत नसत. तर गणित, विज्ञान, समाजशास्त्र असे विषय शिकवले जात.

हे सगळं घडत असताना सावित्रीबाई अवघ्या सतरा- अठरा वर्षाच्या होत्या. एवढ्या लहान वयात प्रवाहाविरुद्ध जाऊन काम करणं आणि काळाच्या पुढचा विचार करणं हे आताच्या काळातही कोणाला सहजा शक्य नाही होत. सावित्रीबाईंचं शिक्षणाबद्दलचं प्रेम, त्याचं महत्त्व त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांनी ठामपणे व्यक्त केलं आहे. अज्ञानाने अंधारलेल्या स्त्रियांच्या आणि बहुजनांच्या जीवनात ज्योत पेटवण्याचं ज्यांनी काम केलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना आपण योग्य तो मान दिला आहे का? किंवा देतोय का? शिक्षणासाठी आणि इतरांना शिक्षित करण्यासाठी ज्यांनी दगड-धोंडे झेलले त्या सावित्रीबाईंच्या जन्मदिनी आपण शिक्षक दिवस का साजरा करत नाही? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

 

  • मल्लिका जयश्री सिद्धार्थ

*Help Dalit Times in its journalism focused on issues of marginalised *

Dalit Times through its journalism aims to be the voice of the oppressed.Its independent journalism focuses on representing the marginalized sections of the country at front and center. Help Dalit Times continue to work towards achieving its mission.

Your Donation will help in taking a step towards Dalits’ representation in the mainstream media.

  Donate

Share News:
Dalit times Marathi
Total Articles: 14

Leave a Comment.

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *